हिंदजागर न्युज, पुणे- प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयासह नऊ विभागीय कार्यालयांमध्ये लवकरच सुमारे ३०० पदांची भरती होणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सुवर्णसंधी मिळणार आहे.या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, यासाठीचा प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
सध्या मंडळाच्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि नाशिक या नऊ विभागीय कार्यालयांत दहावी-बारावी परीक्षा आणि अन्य शैक्षणिक कामकाज केले जाते. २०१९ साली याच मंडळात २६६ कनिष्ठ लिपिक भरले गेले होते. मात्र, गेल्या सहा वर्षांत मोठ्या संख्येने कर्मचारी निवृत्त झाल्याने अनेक पदे रिक्त झाली आहेत. परिणामी कार्यभार कमी कर्मचाऱ्यांवर असल्याने कामाचा ताण वाढला आहे.या पार्श्वभूमीवर, परीक्षा प्रक्रिया व अन्य कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी क्लर्कच्या २८६ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या ११ अशा एकूण २९७ पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अन्य महत्वाच्या भरती
शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, “मंडळ हे स्वायत्त असून, त्याच्या उत्पन्नातूनच पगार, पेन्शन व सुविधा पुरवल्या जातात. मात्र, भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय मान्यता आवश्यक असल्यामुळे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच ही भरती पूर्णत्वास जाईल.”
ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यास, राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असून बेरोजगार उमेदवारांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
स्थानिक प्रतिनिधी- पी.एस.सूर्यवंशी














