हिंदजागर न्युज, प्रतिनिधी – पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. या समस्येवर आता थेट विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनातही चर्चा झाली. गेल्या साडेतीन वर्षांत या शहरांमध्ये एकूण 80,000 लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.पुणे शहरातच 2022 पासून आतापर्यंत तब्बल 79,000 हून अधिक लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तसेच दररोज सरासरी 80 नागरिक या त्रासाला सामोरे जात असल्याचे दिसून येते.या समस्येवर बोलताना आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सांगितले की पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढली असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, ही समस्या गंभीर असून उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने लवकरच आवश्यक उपाययोजना केली जाईल.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात सध्या 2 लाख 25 हजारांहून अधिक भटकी कुत्री आहेत, तर काही स्वयंसेवी संस्थांच्या म्हणण्यानुसार ही संख्या 2.5 ते 3 लाखांपर्यंत गेली आहे. या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येत असली तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 57,852 श्वानांची नसबंदी करण्यात आली, तर 2024-25 मध्ये आतापर्यंत 56,511 कुत्र्यांची नसबंदी झाल्याची माहिती आहे. मात्र, तरीही भटक्या कुत्र्यांची संख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.नावनिर्देशित आमदार इद्रीस नाईकवाडी यांनी सांगितले की, कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेवर योग्य प्रकारे देखरेख होत नाही. नसबंदी झालेल्या कुत्र्यांना ओळखण्यासाठी टॅग लावला गेला पाहिजे, अन्यथा ही मोहीम अपुरीच ठरणार आहे. हॉटेल्स, खाऊगल्ल्या, बाजारपेठा, कचरापेट्या आणि गल्ली-बोळांमध्ये या कुत्र्यांचा उपद्रव अधिक प्रमाणात आहे. वाहनचालकांवर हल्ले होणे, रात्रीच्या वेळेस गाड्यांवर धावून जाणे, अपघात घडवणे, तसेच लहान मुलांवर आणि वृद्धांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
ही समस्या नागरिकांच्या आरोग्यासाठी तसेच सुरक्षेसाठीही मोठा धोका निर्माण करत आहे. त्यामुळे भविष्यात या समस्येवर ठोस आणि व्यापक धोरण राबवणे आवश्यक असल्याचे मत सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने यासाठी तातडीने पावले उचलावी, अशी मागणी जोर धरत आहे.
स्थानिक प्रतिनिधी – गणेश मारुती जोशी.














